। पाली । वार्ताहर ।
पाली खोपोली राज्य महामार्गावर पालीच्या सीमेवर उंबरवाडी येथे भव्य दगडी प्रवेशद्वार (कमान) साधारण 55 वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. मागील अनेक वर्षांपासून या कमानीचे अवशेष शिल्लक राहिले होते. मात्र आता पाली खोपोली मार्गाच्या रुंदीकरणासाठी नुकतेच या प्रवेशद्वाराचे (कमानीचे) राहिलेले अवशेष तोडण्यात आले. या प्रवेशद्वारासोबत अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या असल्याने यावेळी पालीकरांचे डोळे पाणावले.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या गावच्या सीमेवर पाली-खोपोली राज्य महामार्गावर उंबरवाडी नजीक 1965-67 साली शिक्षण महर्षी व रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी पुढाकार घेवुन शासकीय खर्चाने हे भव्य दगडी नक्षीकाम असलेले प्रवेशद्वार (कमान) उभारले होते. त्यानंतर कित्येक वर्षे हे प्रवेशद्वार पालीची शान राखत रुबाबात उभे होते. परंतु नागोठणे येथे जेव्हा आयपीसीएल (सध्याची रिलायन्स) कंपनीची उभारणी सुरू झाली तेव्हा यासाठी लागणारी साधने यंत्रे हि मुंबई-पुणे मार्गे पालीवरुन नेण्यात येऊ लागली. परिणामी या अजस्त्र वाहनांना मोठी यंत्रे घेऊन या प्रवेशद्वारा खालून जाता येईना. त्यामुळे नाईलाजास्तव या प्रवेशद्वाराची वरची बाजू तोडावी लागली. मात्र आता रुंदीकरणामुळे राहिलेले अवशेष देखील तोडण्यात आले आहेत. परिणामी पालीच्या शिरपेचातील एक मोती निखळला आहे. इतर गावांमध्ये जसे प्रवेशद्वार त्या गावची शोभा वाढवत असते, त्याचप्रमाणे पाली गावसाठी पुन्हा भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे. असे माजी ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी सांगितले.
प्रवेशद्वाराच्या जागेवर जवळपास दीड कोटी रुपये खर्चून नव्याने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. यासाठी अंदाज पत्रक व प्रस्ताव कोकणभवन येथे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली