पाणी व वीज प्रश्नांवर पहिल्याच दिवशी ठोस पावले
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी अधिकृत कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत खारेपाट परिसरातील पाणीप्रश्न आणि शिहू-बेणसे भागातील वीज समस्येबाबत ठोस पावले उचलली. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे पेण तालुक्यासह संपूर्ण पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेत सत्तेच्या समीकरणांबाबत राजकीय घडामोडी सुरू असतानाच पल्लवी भोईर यांनी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्यासमवेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेहा भोसले यांची भेट घेतली. यावेळी पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील तीव्र पाणीटंचाईबाबत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेणे, वितरण व्यवस्था व पाइपलाइनचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करणे, त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करणे तसेच गावनिहाय पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा मुद्दा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मांडून ठराव करण्याचीही मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणांची चढाओढ सुरू असतानाही पल्लवी भोईर आणि प्रसाद भोईर यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्याने त्यांच्या पुढाकाराचे मतदारसंघात स्वागत आणि कौतुक होत आहे.







