पंचायत समितीचा अनागोंदी कारभार; अधिकारी-कर्मचार्यांना वेळेचे ताळतंत्र नाही
| पेण | प्रतिनिधी |
तहसील कार्यालयानंतर तालुक्याचे महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालय म्हणून पंचायत समिती कार्यालयाकडे पाहिले जाते. परंतु, गेली दोन ते अडीच वर्षे पेण पंचायत समिती कार्यालयाला पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने या कार्यालयातील कर्मचारी खुशाल चेंडू झाले असून, त्यांना वरिष्ठांची भीतीच उरली नाही. अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊन सर्वसामान्य लोकांची कामे रखडतात. या लेटलतिफ कर्मचार्यांवर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
24 फेब्रुवारी 2020 च्या शासन नियमानुसार पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कार्यालयीन कामाच्या वेळा वाढल्या आहेत. शिपायासाठी 9.30 ते 6.30, तर अन्य कर्मचार्यांसाठी 9.45 ते 6.15 अशी वेळ कामाची आहे. परंतु, याचे अजिबात भान पेण पंचायत समितीच्या कर्मचार्यांना नाही. मात्र, रविवारसोबत शनिवारची सुट्टीदेखील कर्मचारी हक्काने घेतात. परंतु, सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयीन कामकाजाला सुरुवात होते, याचा मात्र विसर कर्मचार्यांना पडतो. आमच्या प्रतिनिधीने 9 वाजून 58 मिनिटांनी पेण पंचयात समिती कार्यालयाला भेट दिली असता गटविकास अधिकारी कक्ष बंद, बांधकाम विभाग बंद, पशुसंवर्धन विभाग बंद, शिक्षण विभागाची खोलीदेखील बंद स्थितीत अढळली. सामान्य प्रशासक विभागामध्ये कुणीही अधिकारी नव्हते. कृषी विभाग पूर्ण रिकामा, ग्रामपंचायत विभागामध्ये कनिष्ठ लिपिक वृशाली मोकल वगळता कुणीही कर्मचारी हजर नव्हते. आरोग्य विभागात अंधारच अंधार होता. मात्र शिपाई प्रमोद काकडे, चंद्रकांत पाटील, चित्रा चवरकर हे तीन कर्मचारी वगळता पूर्ण कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. ही सर्व स्थिती आमच्या प्रतिनिधीच्या कॅमेर्यामध्ये कैद झाल्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवरुन गटविकास अधिकारी लता बबन मोहिते यांना संपर्क केला. त्यावेळी मोहिते यांनी सांगितले की, माझ्याकडे पेण पंचायत समितीची अतिरिक्त जबाबदारी असून, मी आठवड्यातून तीन दिवस पेण कार्यालयात असते. मी सर्व गैरहजर कर्मचार्यांचा एक दिवसाचा पगार कट करून त्यांना कारणे दाखवा नोटीस देणार. उद्या मंगळवारी 11.30 वाजता आपण कार्यालयात यावे, मी केलेल्या कारवाईचा लेखी उत्तर आपल्याला देते.
बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी हजर
पेण पंचायत समिती कार्यालयामध्ये बोटावर मोजण्याएवढे पाच कर्मचारी 10 वाजून 10 मिनिटांनी कार्यालयात हजर होते. बाकी कर्मचारी साडेअकरापर्यंत येत होते. याचाच अर्थ, कर्मचार्यांना वरिष्ठांचा धाक उरलाच नाही, असेच म्हणावे लागेल. तसेच बायोमॅट्रिक मशीन कार्यालयात बसवलेली आहे, ती चालू स्थितीतदेखील आहे. मात्र, कर्मचार्यांच्या हजेरीचा डेटा मशीनमध्ये कैद होऊ नये म्हणून त्या मशीनच्या वायर काढल्या आहेत. कृषीवलचे प्रतिनिधी 10.45 वाजेपर्यंत कार्यालयात हजर होते; परंतु निम्याहून जास्तीचे कर्मचारी आलेच नव्हते.







