प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणार्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
। रायगड । प्रतिनिधी ।
गेल्या काही कालावधीपासून महिलांच्या एसटी प्रवासातील सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये पॅनिक बटण लावण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणार्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासह एसटी बस स्थानकांचे आधुनिकरण करून, प्रवाशांना दर्जेदार सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
राज्यातील एसटी बस स्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यात येणार असून, बांधा वापरा हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बस स्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालये संबंधित विकासकाकडून बांधून घेणे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची राज्यभरात 842 ठिकाणी 1,360 हेक्टर जमीन आहे. त्याचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील 66 जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यात संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागेसह तालुका स्तरावरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा तीन जागा विकसित करावयाची आहेत. त्यामुळे एसटीच्या अविकसित जागाही चांगल्या विकासकाकडून विकसित होतील.
राज्यातील 13 कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार आहे.
25 हजार बस दाखल होणार
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बस भंगारात जाणार आहेत. त्याजागी नवीन बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदा 2,640 लालपरी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी 113 आगारात 800 पेक्षा जास्त नवीन बस प्रवासी सेवेत रुजू झाल्या आहेत. सध्या 3 हजार नवीन बसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण व दुर्गम भागात उपयुक्त ठरेल, अशा मिडी बस घेण्यात येणार आहेत. शहरी भागातील प्रवाशांसाठी 200 अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील. त्यामुळे भविष्यात शहरापासून गाव खेड्यांपर्यंत, महानगरापासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.