Panvel Bus Stand: पनवेल बसस्थानक खड्ड्यात, प्रवाशांचे हाल

नव्या बसस्थानकाची मागणी पुन्हा ऐरणीवर

| पनवेल | प्रतिनिधी |

महामुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहरातील मध्यवर्ती एसटी आगाराची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, खड्डेमय परिसर, अपुऱ्या सुविधा आणि दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पनवेलसाठी अत्याधुनिक आणि प्रशस्त बसस्थानक उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

एकेकाळी ग्रामीण तालुक्याची ओळख असलेले पनवेल आज नवी मुंबईचा अविभाज्य भाग बनले आहे. सिडकोच्या नियोजनबद्ध विकासामुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि इतर पायाभूत सुविधांमुळे पनवेलचे महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले एसटी आगार आजही दुर्लक्षित अवस्थेत असल्याची खंत प्रवासी व्यक्त करत आहेत. बसस्थानक परिसरात सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचत असल्याने प्रवाशांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगारातील काही भागात खासगी वाहनांचे पार्किंग होत असल्याने बसच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

पनवेल बसस्थानकातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील विविध शहरांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवा सुरू असते. मुंबईहून निघणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या बसेस पनवेल आगारातून पुढील प्रवास करतात. त्यामुळे हे आगार केवळ पनवेलचे नव्हे, तर संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांनी पनवेलमध्ये आधुनिक, सर्व सुविधांनी सुसज्ज आणि प्रशस्त बसस्थानक उभारण्याची मागणी केली होती. या ठिकाणी प्रवाशांसाठी अद्ययावत प्रतीक्षागृह, पुरेसे बस फलाट, वाहनतळ, स्वच्छतागृहे तसेच व्यावसायिक गाळ्यांसह नियोजनबद्ध बसस्थानक उभारल्यास पनवेलच्या विकासात मोठी भर पडेल, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि इतर विकास प्रकल्पांमुळे पनवेलचे महत्त्व झपाट्याने वाढत असताना शहराच्या प्रतिमेला साजेसे आधुनिक एसटी आगार उभारण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन बसस्थानकाच्या उभारणीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version