। मुंबई । प्रतिनिधी ।
आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ झाली. मात्र, प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून कमी होऊन 23 लाखांवर आली आहे. बेस्टचे सुमारे 8 लाख प्रवासी घटले आहेत. त्यामुळे बेस्टने घेतलेल्या या निर्णयाने उपक्रमाला फायदा झाला की, तोटा हे आणखी काही महिन्याने स्पष्ट होणार आहे.
कोट्यवधीच्या आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने 9 मेपासून तिकीट दरात वाढ लागू केली. त्यामुळे बेस्टच्या रोजच्या महसुलात वाढ झाली आहे. बेस्टने साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 5 रुपयांऐवजी 10 रुपये तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये अशी तिकीट दरवाढ केली. बेस्टची दरवाढ होण्याआधी 8 मे आधी रोज 31 लाख 50 हजार प्रवासी प्रवास करत होते तर प्रवाशांच्या माध्यमातून रोज 1 कोटी 75 लाखांचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होत होता. मात्र, ही दरवाढ केल्यानंतर 9 मे रोजी 23 लाख 17 हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर त्यामधून बेस्टला तब्बल 2 कोटी 93 लाख 41 हजार रुपयांचा महसूल मिळाला.