शुक्रवार ते रविवार कालावधीत प्रवाशी संख्ये वाढ
| पनवेल | वार्ताहर |
उन्हाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी तसेच पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत खासगी व्यावसायिकांनी बस भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली आहे. अशातच शुक्रवार ते रविवार या कालावधीत प्रवाशांची संख्या वाढत असल्याने दुपटीने भाडे आकारत बेसुमार लूट केली जात आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली या ठिकाणाहून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र व परराज्यातही मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. अशात शाळांना सुट्टी लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने एसटीबरोबरच खासगी वाहनांनादेखील प्रतिसाद मिळत आहे; पण प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन खासगी वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद, जालना, कोल्हापूर, सांगली या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ झाली असून दोन महिन्यांपूर्वी एक हजार ते पंधराशे रुपयांदरम्यान असणारे भाडे 50 टक्क्यांनी वाढल्याने प्रवाशांचा खिसा रिकामा होणार आहे.
मुंबई-पुणेसाठी 350 रुपये
मुंबई, कळंबोली, पनवेल या ठिकाणांहून पुण्याला जाण्यासाठी दररोज हजारो सरकारी तसेच खासगी बस ये-जा करतात. कळंबोली येथून मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग सुरू होत असल्याने या ठिकाणी मोठ्या-प्रमाणात खासगी बसमधून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. नेहमीच्या काळात कळंबोलीवरून पुण्याला जाण्यासाठी खासगी चारचाकी किंवा बस साधारण 150 ते 200 रुपये भाडे आकारते; परंतु सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने हेच दर आता 250 ते 350 वर जाऊन पोहोचले असल्याने मुंबई-पुणे प्रवासदेखील महागला आहे.
हेच दिवस आहेत कमवायचे
खासगी प्रवासी वाहनचालकांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याने या ठिकाणी मनमानी भाडे आकारण्यात येते. यासंदर्भात खासगी वाहनचालकांला विचारले असता सीझन आहे साहेब, हेच दिवस पैसे कमवायचे आहेत. सध्या प्रवाशांनासुद्धा गरज आहे. त्यामुळे थोडी घासाघीस करून वाढीव भाडे देत आहेत.
शासनाने निर्धारित केलेले एसटी बसच्या भाडे टप्प्यापेक्षा पन्नास टक्क्यापर्यंत भाडेवाढ करू शकतो; परंतु, त्यापेक्षा जास्त भाडे आकारल जात असेल, तर तक्रार केल्यास खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नीलेश धोटे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल