ग्रामस्थांच्या मागणीकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सुधागड किल्ल्याकडे जाणार्या पाच्छापूर फाटा ते दर्यागाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण कामासाठी निवेदन देण्यासाठी मंगळवारी (ता.1) रायगड जिल्हा परिषद उपअभियंता पाली यांच्या कार्यालयात स्थानिक नागरिक गेले होते. मात्र, तेथे अधिकारी उपस्थित नव्हते व उपस्थित कोणीही त्यांची दखल घेतली नाही. त्यांनी मग रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले. याआधीदेखील ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदन दिले आहे. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण किल्ला सुधागडकडे जाणार हा मार्ग आहे. तसेच या रस्त्यावर 11 गावं आणि वाड्या अवलंबून आहेत. शिवाय, पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची अतिशय खराब अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचेसुद्धा दुर्लक्ष होत आहे.
दोन वर्षांपासून या रस्त्याच्या नूतनीकरणासंदर्भात अनेक पत्रव्यवहार करून, त्याचा पाठपुरावा करूनही संबंधित खात्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. अशा परिस्थिती पुन्हा निवेदन द्यायला गेलो असता तिथे कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने केवळ रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले, असे उमेश तांबट यांनी सांगितले. यावेळी देतेवेळी उमेश तांबट, संतोष बावधाने, रोशन बेलोसे व खुमाजी बर्गे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.