। औरंगाबाद । प्रतिनिधी ।
टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतनवाढ थांबू शकता, पण वेतन थांबू नका, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या महिन्यापासून शिक्षकांचे वेतन देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. मात्र हा निर्णय फक्त याचिकाकर्ता शिक्षकांसाठी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याबाबत याचिकाकर्ते शिक्षकांचे वकील संभाजी टोपे यांनी माहिती देतांना म्हटले आहे की, औरंगाबाद येथील शिक्षकांच्या याचिका औरंगाबाद खंडपीठात निकाली निघाल्या. यावेळी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ते शिक्षकांचे वेतन थांबवणे म्हणजे त्यांच्या कुटुंबावर सुद्धा अन्यायकारक होईल. आज पहिलीच सुनावणी असल्याने सरकारी वकिलांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला आहे.
शिक्षण विभागाने शिक्षकांचे पगार थांबवण्याच्या निर्णयावर न्यायालयात सुनावणी झाली. सध्या सणासुदीचा काळ आहे. दिवाळी तोंडावर असल्याचे लक्षात घेत, न्यायालयाने शिक्षकांचे वेतन थांबवणे म्हणजेच त्यांच्या कुटुंबावर सुद्धा अन्यायकारक राहील, असे म्हटले आहे. त्यामुळे पुढील तारखेपर्यंत शिक्षकांची सेवा समाप्तीचा निर्णय घेऊन नयेत, त्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे सध्याच्या महिन्यापासून सुरु करावे असे आदेश दिले. सोबतच या शिक्षकांवर कारवाई करायची असेल तर त्यांची वार्षिक वेतन वाढ पुढच्या आदेशापर्यंत थांबवावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.