प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूरस्थितीचा धोका
| पेण | प्रतिनिधी |
पेणकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात अनधिकृतरित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. पेण शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी भोगावती नदी सध्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर भरावाच्या विळख्यात सापडली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठ्या पूरस्थितीचा धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भुंडया पुलापासून ते पायथ्यापर्यंत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. स्थानिकांच्या मते, या बांधकामांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे. एकेकाळी विस्तीर्ण असलेले नदीपात्र आज ठिकठिकाणी अरुंद झाले असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जात आहे.त्यामुळे भविष्यात पेण शहर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भुंडया पुलाजवळील तरणखोप स्मशानभूमी परिसरात पूर्वी मोठे आणि मोकळे नदीपात्र होते. मात्र, आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून रुंदी कमी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे उभी राहिल्याचे स्पष्ट दिसते. काही भराव अलीकडच्या काही महिन्यांतच टाकण्यात आल्याचे स्थानिक सांगतात. जानेवारी महिन्यापर्यंत ज्या भागात नदीपात्र मोकळे होते, त्या ठिकाणी आज मातीचे ढिगारे आणि बांधकाम साहित्य दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या आरोपानुसार, हे काम बहुतांश वेळा रात्रीच्या अंधारात केले जाते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, महसूल खात्याचे तलाठी, मंडळ अधिकारी किंवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांना हे दिसत नाही का? इतक्या मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात बदल होत असताना प्रशासन अनभिज्ञ कसे राहू शकते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत थोडा जरी पाऊस झाला तरी भुंडया पुलावरून पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी नव्याने बांधलेल्या पुलावरूनही पाणी गेल्याचे समोर आले आहे. नदीपात्र अरुंद झाल्यामुळे पाण्याचा वेग आणि पातळी वाढत असून भविष्यात मुसळधार पावसात पाणी नदीपात्र सोडून वस्तीभागात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
एकेकाळी भुंडया पुलाकडून धावत्याकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत नदीपात्र पसरलेले होते. आज अनेक ठिकाणी भराव टाकून तेच पात्र संकुचित करण्यात आले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखणे म्हणजे भविष्यातील आपत्तीला निमंत्रण देणे होय. पूरस्थिती निर्माण झाल्यास याच अतिक्रमणधारकांकडून प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काही नागरिकांनी महसूल विभाग आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र कोणीही उघडपणे पुढे येण्यास तयार नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी 'तलाठ्यांना तातडीने पाहणीसाठी पाठवितो,' असे सांगितले. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोगावती संवर्धन प्रेमी संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, वेळेत कारवाई न झाल्यास ते रस्त्यावर उतरतील. आज कारवाई झाली नाही तर उद्या पूरस्थितीत फक्त नुकसान मोजावे लागेल,फफ असा इशारा देण्यात आला आहे.
तातडीने होणार पाहणी
पेणचे तहसिलदार तानाजी शेजाळ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. परंतु, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांना तातडीने तलाठ्यांना पाहणी करण्यासाठी पाठवतो असे सांगितले.







