शीतपेय, ज्यूस, कलिंगड यांना वाढती मागणी
| कोलाड | वार्ताहर |
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच खर्या अर्थाने उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमानाचा पारा 39 अंशांपर्यंत गेला असून, तो ढगाळ वातावरणामुळे 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने जनता पूर्णपणे हैराण झाली असून, शरीराचा दाह कमी करण्यासाठी जनता शीतपेय, ज्यूस, कलिंगड याला अधिक पसंती देत आहे.
वाढते प्रदूषण व सततच्या पर्यावरणाच्या र्हासाने रानेवने ओस पडू लागली असून, रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या तापमाणामुळे नागरिक पूर्णपणे हैराण होत आहेत. यामुळे शरीराला गारवा मिळण्यासाठी शीतपेय, ज्यूस, कलिंगड याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.
आताच उन्हाचा पारा 39 अंशांवर गेला असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. भरमसाठ वृक्षतोड व दिवसेंदिवस लावण्यात आलेले वणवे यामुळे परिसर व रस्ते आग ओकताना दिसत आहेत. प्राणीही सावली व डबके यांचा आधार घेत आहेत, तर दुपारच्या वेळी बाजारपेठही ओस पडलेली दिसत आहे. तसेच प्रचंड उष्णतेमुळे शेतीच्या मशागतीची कामे करणारा शेतकरी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत व दुपारी चार वाजल्यानंतर शेतावर जात आहे. यामुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. या सर्व दाहक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंडगार शीतपेय, लिंबू सरबत, लस्सी, कोकम सरबत, उसाचा रस, कलिंगड यांचा आधार घेत आहेत.