। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सहावर्षे बंद असलेली रामाचीवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरु झाली आहे. ग्रामस्थांचा सहभागामुळे शाळेची वास्तू पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेली होती. मात्र, भौतिक सुविधांपासून दूर असलेल्या या शाळेसाठी सन फार्मा या कंपनीने आपला सीएसआर फंड देऊन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल रामाचीवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी पत्र देऊन आभार मानले आहेत.
2017 मध्ये कमी पटसंख्यामुळे कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रुप ग्रामपंचायतमधील रामाचीवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्यात आली होती. 100 टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या आदिवासी शाळतील विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर अंतरावरील अंजप गावातील जिल्हा परिषद शाळेत जावे लागत होते. त्यामुळे पालकांनादेखील विद्यार्थ्यांसोबत जावे लागायचे. परिणामी रोजगार बुडत असल्याने पालकांनी कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ऑक्टोबर 2023 मध्ये या शाळेची घंटा पुन्हा वाजली होती. मात्र, शाळेतील अनेक पायाभूत सुविधांची विद्यार्थ्यांना कमतरता भासत होती. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी सन फार्मा या कंपनीबरोबर बोलणे सुरु केले आणि त्यांच्या पदाधिकार्यांनी रामाचीवाडी येथील शाळेसाठी अनेक वस्तू आपल्या कंपनीच्या सीएसआर फंडातून देऊन शाळेच्या परिसराला नवीन रूप आणले.