। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोना काळात गेले दोन वर्षे आधीच शिक्षणाची लिंक तुटल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर शाळा सुरू झाल्या. पण एसटी बंद असल्याने पुन्हा शिक्षणाशी जुळलेली नाळ तुटली. लांजा आगारातील निम्म्या बसफेर्या शालेय विद्यार्थ्यांसाठी होत्या. बंदमुळे या बहुतांश फेर्या बंद पडल्याने त्यावर अवलंबून असणार्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार ही लालपरीवर अवलंबून आहे. एसटी बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातून येणार्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बंदमुळे बस फेर्या कमी असून तसेच सुरू असलेल्या मोजक्या बस वेळेत सुटत नसल्याने शिक्षणासाठी कुवे, वनगुळे, इंदवटी, पन्हळे, गवाणे, कोलधे, झापडे-कांटे, केळंबे, खेरवसे, बेनी, आसगे अशा भागातून येणार्या विद्यार्थ्यांना 5 ते 10 किमी पायपीट करावी लागत आहे. बसच्या फेर्या कमी असल्याने विद्यार्थी पायी प्रवास करत आहेत.