। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर पडतात. तसेच, सततच्या पावसामूळे कधी दिवसा तर कधी रात्री वीज खंडीत होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती आदि लोकांना मोठया प्रमाणात बसतो. वीज ये-जा करत असल्याने नागरिकांच्या घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज आदी उपकरणेही खराब होत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना बसत असतो. या समस्यांवर वेळीच योग्य ती उपाय योजना झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
तालुक्यातील एखादया भागात वीज गेली असता त्याच भागातील वीज न घालवता संपूर्ण तालुक्याची वीज घालवली जाते. तसेच, मुसळधार पाऊस पडल्यानंतर पडलेली झाडे वीजेच्या तारांवर तशीच पडून राहतात. महावितरणचा कर्मचारी वर्ग वेळेत त्या ठिकाणी पोहोचत नाही. यामुळे नागरिकांना वीजेपासून तासनतास वंचित राहावे लागते. या सर्व वीजेच्या संदर्भात नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयात फोन केला असता तो फोन देखील बंद असतो. जरी फोनची रिंग वाजली तरी फोन कोणीच उचलत नाही. रात्री अपरात्री पाऊस, वादळवार्यामुळे कुठे काही अनूचित घटना घडली किंवा अपघात घडला तर अशा आपातकालीन वेळी नागरिकांचा फोनद्वारे महावितरणच्या कार्यालयात संपर्क होत नाही. त्यामूळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कारणामूळे लाईट गेली याची ही माहिती मिळत नाही. अशावेळी नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
या उरणच्या सर्वसामान्य जनतेची पावसाळ्यातील वीजेची महत्वाची समस्या लक्षात घेउन पावसाळ्यात वीज खंडीत करू नये. ज्या विभागात काम चालू असेल तर त्याच भागातील वीज घालवावी, कामासाठी इतर ठिकाणाची वीज खंडीत करू नये. तसेच, नागरिकांना आपली समस्या, तक्रार फोनद्वारे कार्यालयात कळविण्यासाठी त्वरित लँडलाईन (हेल्पलाईन) सुरू करून जनतेच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी प्रधान सचिव (मुंबई मंत्रालय), उर्जामंत्री (मुंबई मंत्रालय), जिल्हाधिकारी अलिबाग रायगड, उपायुक्त परिमंडळ झोन 2, तहसिलदार उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उरण, मुख्य अभियंता महावितरण उरण, महाराष्ट्र विद्युत मंडळ उरण आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे.
ग्राहकांची समस्या लक्षात घेउन ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू. या समस्येबाबत संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांची योग्य ती दखल घेतली जाईल.
सिंहाजीराव गायकवाड,
अधीक्षक अभियंता, वाशी-नवी मुंबई