धूप प्रतिबंधासाठी फायदेशीर; जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन
। रायगड । प्रतिनिधी ।
तळिये आणि इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने बोध घेत दरड रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मातीची धूप रोखण्यासाठी बांबूच्या झाडाचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. जिल्ह्यातील दरडग्रस्त भागात बांबूची लागवड करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. बांबूपासून रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भूस्खलन रोखण्यासाठी बांबूचा फायदा होणार आहे. त्यामुळे बांबू लागवड दरडमुक्तीसाठी एक वरदान ठरणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. इर्शाळवाडीत दरड कोसळून 84 जणांना प्राण गमवावे लागते. अशाच घटना याआधी महाड तालुक्यातील तळिये, पोलादपूर, कर्जत तालुक्यातही घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत दरड रोखण्यासाठी बांबू लागवड केली. येथील डोंगरभागात सुमारे दोन लाख बांबूच्या रोपांची लागवड केली. बांबूची मूळ माती धरून ठेवतात. मातीची होणारी धूप थांबवण्यास बांबूची मोठ्या प्रमाणात मदत होते. हे लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेने यात पुढाकार घेत जिल्ह्यातील गावे, वाड्यांच्या भागात बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बांबू लागवडीसाठी तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहायता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात सुमारे सात लाखांपेक्षा अधिक बांबूची बेटे तयार केली जाणार आहेत. बांबूचे आयुर्मान साधारणतः 35 ते 40 वर्षांचे असते. बांबूची लागवड केल्यावर तीन ते चार वर्षांत उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. जिल्ह्यातील काही तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टी होते. दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते. याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. रायगड ग्रामीण जिल्हा असल्याने जिल्ह्यात आजही बांबूपासून तयार होणार्या वस्तूंना पसंती दर्शवली जाते. टोपली, सूप, झोपाळा, बांधकाम व्यवसाय, खुर्ची, आराम खुर्ची, डायनिंग सेट, सोपा सेट, टी पॉय, शो पीस, वॉटर फॉल, विद्यूत दिवे, बेड, ट्रॉली, परडी अशा अनेक प्रकारचे फर्निचर बनवण्याचे काम बांबूपासून केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी बांबूच्या गॅलरी उभ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बांबूला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीमुळे व्यवसाय वृद्धीला चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरड रोखण्यासाठी बांबूची लागवड खूपच महत्त्वाची ठरते. बांबू जमिनीची धूप थांबवण्याचे काम करतात. कोकणातील जमिनीत बांबू लागवड चांगल्या प्रकारे होत असल्याने यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर बांबूची लागवड करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपे तयार करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
प्रसाद गायकवाड, वनक्षेत्रपाल,
सामाजिक वनीकरण, अलिबाग