प्लास्टिक कचर्‍याने गुरांचे आरोग्य धोक्यात

डम्पिंग ग्राउंडवर प्लास्टिकचे ढीग
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यातच पाली सुधागड सह संपूर्ण जिल्ह्यात मोकाट गुरे हे आपले खाद्य हे कचरा कुंड्या व डम्पिंग ग्राउंडवर शोधत आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुक्या चार्‍याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्नाची कमतरता भासू लागली आहे. ही मोकाट गुरे सध्या सर्वत्रच कचराकुंड्या व उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्‍न देखील ऐरणीवर आला आहे.

पालीतील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधलीआळी, बल्लाळेश्‍वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळपासूनच मोकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात,त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. बर्‍याचवेळा टाकुन दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते.

त्यामुळे गुरे मरतात देखील. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखील मृत्यू होतो आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते. पालीचे उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्या म्हणण्यानुसार गुरांना पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकरी किंवा गुरेमालक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे.

नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत. शेतकर्‍यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. त्यांना पेंढा किंवा सुके व ओले गवत खाऊ घालावे. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जीवन अंगिकारणे गरजेचे आहे.

– डॉ. प्रशांत कोकरे, सुधागड तालुका पशुधन विकास अधिकारी


मानवाबरोबर प्राण्यांचे जीवनही तेवढेच महत्त्वाचे आहे. निसर्ग साखळीतील प्रत्येक आज महत्त्वाचा आहे, यामुळे या सर्वाचा विचार गांभिर्याने होणे गरजेचे आहे. गेले काही वर्ष गुरांच्या चार्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. संबधित गुरे मालकांना याची कल्पना दिली पाहिजे. यासाठी संबधित प्रशासनाने याकडे गांभिर्याने बघणे गरजेचे बनले आहे.

– नोएल चिंचोळकर, पाली


Exit mobile version