जि.प.चा प्लास्टिक कचरा मुक्तीचा नारा

प्रत्येक तालुक्यात उभारणार संकलन केंद्र

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

वाढत्या नागरीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या कचर्‍यात प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. प्लास्टिक कचर्‍याची ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचरामुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या सहाय्याने प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र निर्माण करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे.

रायगड हा ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जात असून, जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी गावांमध्ये प्रकल्प उभे राहिल्याने औद्योगिकीकरणदेखील वाढत आहे. मुंबईच्या जवळ असल्याने या जिल्ह्यातील गावांमध्ये लोकवस्ती वाढू लागली. यामुळे जिल्ह्यात कचर्‍याचे प्रमाणही वाढू लागले आहे. या कचर्‍यात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आहे.

प्लास्टिक कचर्‍याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकून आगळावेगळा उपक्रम गाव पातळीवर सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपैकी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 15 ग्रामपंचायतींची निवड जिल्हा परिषदेने केली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात संबंधित ग्रामपंचायतीव्यतिरिक्त आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमधील प्लास्टिक कचरा जमा करण्यात येईल.

प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून गावे, वाड्यांच्या परिसरात असलेल्या प्लास्टिक कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांगावात जनजागृती करून कचरामुक्तीसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील गावे प्लास्टिक कचरामुक्त होण्यास मदत होणार आहे.

प्लास्टिक संकलन केंद्राची ठिकाणे
प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील चेंढरे, माणगाव निजामपूर, कर्जत पाषाणे, उरण चाणजे, पनवेल पालीदेवद, मुरुड काशिद, तळा बोरघर हवेली, श्रीवर्धन दिवेआगर, म्हसळा खामगाव, रोहा नागोठणे, महाड बिरवाडी, खालापूर तांबाटी, पेण वडखळ, सुधागड परळी, पोलादपूर कापडे बुद्रुक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मंगळवारी पार पडली बैठक
तालुकास्तरावर उभारण्यात येणार्‍या प्लास्टिक संकलन केंद्रांच्या कामांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी (दि.28) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी 13 तालुक्यांत केंद्र उभारणीचे काम सुरू असून, उर्वरित दोन तालुक्यांत लवकरच काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संकलन केंद्राचे काम वेळेत पूर्ण करावे. यामध्ये सामाजिक संस्था, ग्रामस्थ, महिला मंडळे यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. यावेळी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्यासह सुदेश फाऊंडेशन, लहाज प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, स्वदेश फाऊंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version