| रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरातील पाताळगंगा औद्योगिक परिसर, बीपीसीएल कंपनी, इस्रो कंपनी, तसेच पिल्लये कॉलेज व इतर शाळा, त्यासोबतच निवासी वसाहती येथील नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणात ये-जा करणारे चाकरमानी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी 7.45 च्या सुमारास दिवाहून सावंतवाडी जाणारी पॅसेंजर आणि दुपारची 12.30 च्या सुमारास रत्नागिरी-दिवा ही पॅसेंजर येथे थांबत नसल्याने सर्व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
लॉकडाऊन अगोदर नियमितपणे रेल्वे रसायनी रेल्वे थांब्यावर थांबत होत्या. सध्या रसायनी थांबा घेतच नसल्याने सदर रेल्वे रसायनी थांब्यावर थांबविण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे नागरिकांतून करण्यात येत आहे. तसेच ज्या रेल्वे थांबत आहेत, त्यांचे तिकीट मिळण्याची सोयही इथे उपलब्ध नसल्याने पनवेल इथे पकडले गेल्यास फुकट भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच रसायनी ते पनवेल हे प्रवासी भाडे दहा रुपये असताना कोरोना काळात स्पेशल ट्रेनसाठी लावलेले 30 रुपये भाडे अजून तसेच असल्याने प्रवाशांना नाहक जास्तीचे भाडे सोसावे लागत आहे. ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे.