राजकारण्यांची कलंकशोभा आरोपांची राळ, कलगीतुरा

| मुंबई | प्रतिनिधी |

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेले कलंक आहे, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्याला ठाकरे गटानेही प्रत्युत्तर दिल्याने दिवसभर आरोपांच्या फैऱ्या झडत होत्या. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कलंक शब्द योग्यच असल्याचा दावा केला. मी भाषणात म्हटलं कलंक हा शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना कलंकितच करत आहात.

त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात का घेता? माझा कलंक शब्द इतका प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं. जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा आरोप करताना. मला हे काही बोलताना गंमत वाटत नाही. अफझल खानाची स्वारी असंही म्हटलं होतं. पण त्यामागे माझा हेतू हा होता की ईडी आणि आयकर हे जे काही घराघरात घुसवत आहेत त्याचा अर्थ काय आहे? ते कुटुंब कलंकित होत नाही का? मी एक शब्द वापरला तर इतकी तळपायाची आग मस्तकाला का गेली? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तुम्ही लोकांवर आरोप करता, त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना कलंकित करता. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देऊन पवित्र करुन घेता, मग त्यांचा उल्लेख कसा करायचा? संजय राऊत आणि अनिल परब यांना काय हे लोक कमी छळत आहेत का? कलंक काय होता ते मी दाखवून दिलं तर त्रास झाला. माझ्या झालेल्या ऑपरेशनवरुन माझी चेष्टा करतात. मी जे काही सहन केलं ते कुणाला भोगावं लागू नये. कुणाच्या कुटुंबावर बोलता, प्रकृतीवर बोलता तो कलंक नाही का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला आहे. असं दिसतंय. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यांची मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Exit mobile version