देशातील राजकारण अंधाराकडे- प्रा. नरके

| पनवेल | वार्ताहर |

सध्या देशभरात सुरु असलेल्या राजकारणाची वाटचाल ही अंधाराकडे होत असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते हरी नरके यांनी खांदा वसाहत येथे व्यक्त केले. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित आंबेडकर जयंती महोत्सवात व्याख्यानावेळी ते बोलत होते.

आंबेडकर जयंती साजरी करीत असताना केवळ आनंदोत्सव साजरा न करता बाबासाहेबांचे विचार ऐकण्याची संधी नागरिकांना मिळावी म्हणून विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक, डॉ. बाबासाहेबांचे, महात्मा फुले यांच्यावरील दुर्मिळ असे अनेक ग्रंथ प्रकाशित करण्यात महत्त्वाचे योगदान असलेले अभ्यासू विचारवंत, अनेक पुस्तकांचे लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते हरी नरके यांचे व्याख्यान खांदा वसाहतीमधील सेक्टर-9 येथील तक्षशिला बुद्ध विहार याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महादेव वाघमारे यांनी केले होते.

यावेळी बोलताना हरी नरके म्हणाले की, रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा आणि बाबासाहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. हे बाबासाहेबांच्या लेखनामधून, कागदपत्रांमधून विशेषत: पत्रव्यवहारामधून दिसून येतात. नारायण नागू पाटील आणि इतर अनेक कार्यकर्त्यांचे आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातूनच इथे उभा झालेले शेतकरी आंदोलन, शेतकरी चळवळी आणि शेतकरी परिषदांचा असा एक मोठा इतिहास आहे आणि त्याबद्दलची कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे रायगडची जनता शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या सोबत होती, असे मत प्रा. नरके यांनी व्यक्त केले. याबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाचा विविध पैलूंचा उलगडा या व्याख्यानमार्फत केला.

यावेळी बोलताना आयोजक महादेव वाघमारे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही समितीतर्फे थोर महापुरुषांच्या विचाराचा जागर करतो आणि हा इथून पुढे असाच चालत राहणार आहे. तक्षशिला बुद्ध विहार येथे सर्व संघटना एकत्र येऊन जयंती साजरी केली. सर्वांचा असाच पाठिंबा मिळत राहो आणि यापुढे मोठमोठे व्याख्यातांना आमंत्रित करून बाबासाहेबांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी कार्य करत राहू, असे आश्‍वासीत केले. दरम्यान, जयंतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे तसेच मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version