| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळणे मुश्किल झाले आहे. रोड टॅक्सच्या माध्यमातून करोडो रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र शासनाला पाऊस जाऊन दोन महिने झाले तरी रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे वाटत नाही याचे आश्चर्य वाटते, अशी टीका निवृत्त मुख्याध्यापक संघटनेचे राज्य सचिव श्रीकांत पाटील यांनी केली आहे.
वाहन खरेदीवर हजारो रुपये रोड टॅक्स शासनाला देणारा सर्वसामान्य ग्राहक मात्र संबंधित खात्याला त्या रस्त्यांवरुन प्रवास करताना हजारो शिव्या मोजत असेल एवढे नक्की! खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये रोज हजारो माणसे मृत्युमुखी पडतात, तर त्याहून जास्त कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखीमुळे मरणयातना भोगतात. यापूर्वी भर पावसात खड्डे भरण्याचे काम सुरू असायचे, त्यातून प्रवाशांबद्दल सहानुभूती दिसून यायची. पण चालू वर्षी पाऊस कमी पडूनदेखील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबई-गोवा रोड अनेक आंदोलने होऊनही गेंड्याच्या कातडीच्या सरकारने काहीही केले नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
अलिबाग-पेण रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा असून, एकूण रस्त्यात खड्डे कमी आहेत पण जे आहेत ते जीवघेणे आहेत. वाशी फाटा ते रामवाडी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे, चक्क रस्ता गायब आहे असे वाटते. धरमतर परिसरात खड्डे, शहाबाज, पोयनाडजवळचे खड्डे, चरी,पळी, तिनवीरा येथील डावी बाजू पूर्णपणे खचली आहे. येथे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात घडू शकतो, अशीच भयानक परिस्थिती खंडाळा पूल, राऊत वाडी, वेश्वी-गोंधळपाडा, पिंपळभाट येथील आहे. रस्त्यांवर लोक मरत असताना शासन आपल्या दारी कशासाठी, असा सवाल पाटील केला आहे.
पनवेल ते कोलाड रस्ता अत्यंत वाईट आहे. रसायनी ते खारपाडा, खारपाडा ते चिरनेर, वशेणी रस्ते खराब आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन हे पर्यटनासाठी उत्तम असताना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसत आहे. तरी शासनाने त्वरित लक्ष घालून प्रवाशांचे हाल कमी करावेत, अशी मागणी श्रीकांत पाटील यांनी केली आहे.