…म्हणून चिपळूण शहरविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

गटनेते दिशाभूल करत असल्याच्या आरोपाने खळबळ
चिपळूण | प्रतिनिधी |
शहरातील महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गट नेत्यांनी स्वतःच्या पक्ष नेत्यांना आणि नगरसेवकांना अंधारात ठेवून परस्पर पत्र देऊन निविदावीना झालेल्या कामांची तब्बल 1 कोटी 28 लाख रुपये बिल अदा करण्यासाठी समत्ती दिली असल्याचा गौप्यस्फोट महाविकास आघाडी बैठकीत अविनाश केळसकर यांनी करताच सर्वच अवाक झाले.गटनेत्यांवर आरोपांच्या फैरी झडल्या.महिला सदस्यांनी गंभीर आरोप केले.त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते देखील चिडीचूप झाले.

चिपळूण नगरपालिकेच्या सत्तेसाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख जयंतशेठ खताते,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी,माजी नगरसेवक शिरीष काटकर,महंमद फकीर आणि आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.मात्र शिवसेनेचे गट नेते शहरप्रमुख उमेश संकपाळ उपस्थित नव्हते.आणि तेच सर्वांचे टार्गेट ठरले.

शहरातील वाढीव विकास कामे तसेच इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्राच्या विषयावरून महाविकास आघाडीची ही बैठक अक्षरशः गाजली.वाढीव कामाचे तब्बल 1 कोटी 28 लाख रुपये दिले गेले.आणि निविदा न काढताच हे पैसे दिले गेले असल्याचा आरोप अपक्ष नगरसेवक अविनाश केळसकर यांनी केला.तसेच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या गट नेत्यांनी अधिकृत पत्र दिल्यामुळेच हे बिल दिले गेले हे देखील केळसकर यांनी बैठकीत उघड केले आणि उपस्थित नेते देखील अवाक झाले.

आम्हाला या बाबत कोणतीच माहिती नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी स्पष्ठ केले तर शिवसेना गट नेते उमेश सकपाळ यांनी तसे पत्र माझ्याकडून लिहून घेतले असा गंभीर आरोप काँग्रेस गटनेते सुधीर शिंदे यांनी बैठकीत केला.तर सुधीर शिंदेनी पत्र दिले म्हणून मी दिलं.असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी गटनेते बिलाल पालकर यांनी दिले.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंतशेठ खताते यांनी आपल्या नगरसेवकांना कडक भाषेचे जाब विचारला.आम्हाला अंधारात ठेवून हे कसे करता तुम्ही लोक ?हे योग्य नाही.असेही सुनावले.

महिला नगरसेवकांनी तर अतिशय गंभीर आरोप केले.आर्थिक देवाणघेवाणच्या विषयात आम्हाला ओढले जाते पण आम्हाला त्याची कल्पना देखील नाही.नेहमीच आम्ही बदनाम होतोय.नागरिक आम्हाला प्रश्‍न विचारताहेत.आशा भाषेत सुनावले असल्याची माहिती मिळाली आहे.अविनाश केळसकर यांनी इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय उपस्थित करत बैठकीत पुन्हा एक मोठा बॉम्ब टाकला.उर्वरित कामासाठी मार्चमध्ये आलेल्या निविदा आद्यप उघडल्या का नाहीत.?गट नेते काय करतायत.?या प्रश्‍नाने तर सर्वच घायाळ झाले.उमेश सकपाळ राजीनामा देणार म्हटले होते ?काय झाले.?नाट्यप्रेमी आणि नागरिकांची दिशाभूल का केली जातेय.?असा जणू घरचा आहेरच केळसरकर यांनी दिला.

जर महाविकास आघाडी आणि वरिष्ठ नेते ठोस भूमिका घेणार नसतील तर मग मला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल.आणि ती मी करणारच आहे.जनतेची दिशाभूल करून पैशाचा दुरुपयोग मी करू देणार नाही असा थेट इशाराच त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत दिला.त्यामुळे सर्वांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.अशी माहिती देखील काही पदाधिकार्‍यांनी दिली.एकूणच ही बैठक प्रचंड गाजली आणि वादग्रस्त ठरून महाविकास आघाडीची धुसफूस चव्हाट्यावर आली.अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

Exit mobile version