एसटीच्या महामंडळाची अभिनव संकल्पना
। रायगड । सुयोग आंग्रे ।
उन्हाळी सुट्टीत गावी जाणार्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारींचे निवारण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना राबवली आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख थांब्यावर दि.15 एप्रिल ते दि.15 जूनदरम्यान सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यत विभागीय कार्यालय व कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचारी ‘प्रवासी मित्र’ म्हणून तैनात राहणार आहेत.
जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या रामवाडी विभागीय कार्यालयांतर्गत 8 आगारांमधून दररोज सुमारे 450 एसटी रस्त्यावर धावतात. त्यातून सरासरी दीड लाख प्रवासी प्रवास करतात. या सेवेतून एसटीला सुमारे दहा लाखांचे उत्पन्न दिवसाला मिळते. दि.15 एप्रिलपासून उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. एसटीच्या प्रवासाला नागरिक प्राधान्य देत असल्याने चालक, वाहक बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी असतानाही मार्गातील नियोजित थांब्यावर थांबत नाहीत. प्रवाशांना नियोजित ठिकाणी उतरता येत नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ‘प्रवासी मित्र’ ही योजना राबवली आहे.
येथे चुकविला जातो थांबा :- रामवाडी, वडखळ, इंदापूर, महाड, वाकण , वडखळ, कार्लेखिंड
हे असणार प्रवासी मित्र सर्व विभाग नियंत्रक यांनी विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचारी (सर्व शाखांमधील लिपिक, वरिष्ठ लिपिक लेखाकार इत्यादी) व आगार व्यवस्थापक यांनी त्यांचे आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी/प्रशासकीय कर्मचारी (लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखाकार, वाहतूक नियंत्रक इ.) यांची प्रवासी मित्र म्हणून निवड करण्यात आली आहे.
महामंडळाची प्रवासी मित्र ही योजना चांगली असली तर थांब्यावर संध्याकाळी सात वाजेपर्यंतच कर्मचारी कार्यरत असणार आहेत. सायंकाळी 7 ते 11 या वेळेत मोठ्या संख्येने प्रवासी लांब पल्ल्याच्या एसटीने प्रवास करतात. या वेळेत प्रवाशांच्या मदतीला एसटीचे कर्मचारी असणे आवश्यक आहे. कारण या वेळेत वाहतूक कोंडीत अडकलेल्या गाड्या नेमक्या थांब्यावर कधी येणार, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. परिणामी, महामंडळाने संध्याकाळी सातनंतर कर्मचार्यांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात सागरकिनारा, गड-किल्ले पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. त्याचबरोबर विद्यार्थी, नोकरवर्ग आणि कोकणात जाणारी प्रवासी संख्या अधिक आहे. या प्रवासी वर्गाला उत्तम प्रवासी सुविधा मिळावी, यासाठी राज्य परिवहन मंडळ नेहमीच सतर्क असते. आता प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रवासी मित्र थांब्यांवर तैनात असणार आहे.
दीपक घोडे
विभागीय नियंत्रक, रायगड