संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्याची तयारी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

वीज कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे. वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून, हे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणार्‍या अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे. अशा ठिकाणी आजच साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

रही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435/1800-233-3435/1912/ 19120 यावर संपर्क साधावा. याशिवाय ठाणे मंडळातील ग्राहक मोबाईल क्र. 9930269398 सुद्धा संपर्क करू शकतात. तसेच, वाशी मंडळातील ग्राहक मोबाईल क्र. 9920491386 (नियंत्रण कक्ष) व मोबाईल क्र. 8879935501/9930025104 सीसीएफसी व डीएसएस या क्रमांकावर संपर्क करू शकतात. त्याचप्रमाणे, पेण मंडळातील ग्राहकांनी मोबाईल क्र.7875765510 या क्रमांकावर संपर्क करून वीजपुरवठा खंडित झाल्याबाबतची माहिती कळवू शकतात.

संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना.श्री. देवेंद्र फ़डणवीस यांच्या उपस्थित दि. 4 रोजी दुपारी 1.00 वा. सह्याद्री अतिथी गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version