पाण्याच्या अपव्ययावर प्रितम म्हात्रेंनी उठविला आवाज

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने घेतली दखल

| पनवेल | वार्ताहर |

गेले काही दिवस ओएनजीसी फाटकाजवळ पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी साचत आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी साचत असल्याने वाहतुकीला आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची पाईपलाईन फुटून तब्बल 15 दिवस उलटले आहेत. असे असतानाही हा अपव्यय थांबविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हता. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेलचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी पाणी पुरवठा विभागाबरोबर संपर्क साधून तातडीने पाण्याचा होणार अपव्यय थांबविण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिल्या आहेत.

प्रितम म्हात्रे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली आणि या संदर्भात लवकरच उपायोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून एक नोटीस जाहीर करण्यात आली. यामध्ये न्हावा शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा 1 तालुका पनवेल येथे 30 ऑक्टोबर सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत नियोजित पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये कोळखे ओएनजीसी फाटकाजवळ गळती दुरुस्ती करणे, वडघर सत्यम बिल्डिंग नाल्यात 18 मीटर पाईप बदलणे, समता नगर, गाढी नदीत लहान मध्यम स्वरूपाच्या गळत्या दुरुस्ती करणे अशी कामे होणार आहेत .

गेल्या काही दिवसापासून ओएनजीसी फाटकाजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. सदरची पाण्याची पाईपलाईन नव्याने बसवण्याचे 36 किमी पैकी 7.5 किमीचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आठ पथके कार्यरत आहेत. 30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून 12 तासाचा शटडाऊन घेऊन दुरुस्ती सोबतच इतर काही ठिकाणी सुद्धा कामे करणार आहेत.

प्रितम जनार्दन म्हात्रे, मा.विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका
Exit mobile version