। अहिल्यानगर । प्रतिनिधी ।
पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत मोहोळने कुस्ती क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दरम्यान, शिवराज राक्षेच्या वादग्रस्त वर्तणुकीमुळे ही स्पर्धा गाजली, तर विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला.
अहिल्यानगरमध्ये रंगलेल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने उत्कृष्ट कामगिरी करत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला आहे. या विजयासह मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आणि कुस्ती क्षेत्रात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. या विजयाने त्याच्या कुटुंबाचे आणि प्रशिक्षकांचे स्वप्न साकारले, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा गादी गटातून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. तर, महेंद्र गायकवाड माती गटातून अंतिम फेरीत पोहोचला होता. दोन्ही कुस्तीपटूंमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळाली. सामना सुरू होताच मोहोळने पहिला गुण मिळवत आघाडी घेतली; मात्र, काही वेळातच गायकवाडनेही गुण मिळवत बरोबरी साधली. त्यानंतर मोहोळने जोरदार आक्रमण करत आणखी एक गुण मिळवला; मात्र, याच क्षणी काहीसा गोंधळ उडाला आणि गायकवाडने मैदान सोडले आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित केले. पृथ्वीराज मोहोळच्या भव्य विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला महाराष्ट्र केसरी किताब बहाल करण्यात आला. यावेळी त्याला चांदीची गदा आणि थार गाडी पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आली.