बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
| रायगड | प्रतिनिधी |
महाड येथे एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटून भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. चालकासह प्रवाशांनी प्रसंगावधान राखत सर्वजण बसमधून बाहेर पडले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. महाड एमआयडीसी अग्नीशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसलीतरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बसमध्ये 19 प्रवासी आणि चालकासहित कंपनीचे चार असे एकूण 22 जण प्रवास करीत होते.
रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मालकीची औदुंबर छाया ट्रॅव्हल्स ही कंपनी आहे. या कंपनीने गौरव चव्हाण यांच्या मालकीची बस भाडेतत्त्वावर घेतली होती. सदरची बस बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. ती मध्यरात्री उशिरा सुमारे अडिच वाजण्याच्या सुमारास महाडच्या सावित्रीपुलाजवळ आली. बसच्या उजव्या बाजुचा मागील टायर फुटून टायरने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. तसेच, बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचा जोर जास्त असल्याकारणाने तिने भीषण स्वरूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच काही वेळातच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून सुखरूप मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे.