| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
या देशाच्या लोकशाहीला माझ्या कुटुंबाने रक्त शिंपडलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा कुटुंबाचा अपमान कसा काय करू शकता, असा प्रश्न काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला विचारला राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहादरम्यान प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची 32 वर्ष जुनी आठवण सांगत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलचं सुनावलं. या देशाची लोकशाही माझ्या कुटुंबाच्या रक्ताने मोठी केली आहे असं प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटलं. तसंच केंद्रीय मंत्र्यांकडून वारंवार गांधी कुटुंबाचा अपमान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी 32 वर्ष जुनी आठवण सांगितली. 1991 मध्ये माझ्या वडिलांची अंत्ययात्रा तीन मूर्ती भवन येथून निघत होती. मी आपल्या आई आणि भावासोबत गाडीत बसलेली होती. समोर भारतीय लष्कराचा ट्रक होता. ट्रक पूर्पणणे फुलांनी भरलेला होता. त्या ट्रकमध्ये माझ्या वडिलांचा मृतदेह होता. थोड्या वेळानंतर राहुल गांधी यांनीे मला गाडीतून उतरायचं असल्याचं सांगितलं. तेव्हा माझ्या आईने सुरक्षेचा मुद्दा असल्याने नाही म्हटलं. पण नंतर राहुल गांधी गाडीतून खाली उतरले आणि लष्कराच्या मागून चालू लागले. कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेत चालत चालत तो इथे पोहोचला. या जागेपासून 500 फुटांच्या अंतरावर माझ्या भावाने वडिलांवर अंत्यसंस्कार केले, अशी आठवण प्रियांका गांधींनी सांगितली.
जर तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत असाल तर मला सांगा भगवान श्रीराम कोण होते? त्यांना वनवासात धाडण्यात आलं. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाबतचं जे कर्तव्य होतं त्याचं पालन केलं. मग राम घराणेशाही मानणारे होते का? – प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या
ट्विटर बायोमध्ये बदल
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर बायो मध्ये बदल केला आहे. डिक्वालिफाईड एमपी असा उल्लेख करत राहुल गांधी यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.