शरद पवारांचे प्रतिपादन, मुंबईत अभिष्टचिंतन सोहळा
मुंबई | प्रतिनिधी |
देशासमोर असंख्य प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीतील नेहरु सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
पवार म्हणाले, बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचं वैशिष्ट आहे आणि म्हणून आज जे असंख्य प्रश्न देशासमोर आहेत. सामान्य लोकांच्या समोर आहेत. त्याच उत्तर शोधण्यासाठी आणि त्याची सुटका करण्यासाठी प्रभावीपणे काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता कोणता? हा निष्कर्ष लोकांनी काढताना तो राष्ट्रवादी काँग्रेसचं असू शकतो, असं झालं पाहिजे. समाजातील लहान घटकांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी करायला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
12 डिसेंबरचा योगायोग
12 डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर 12 डिसेंबर हा माझ्या आईचा वाढदिवस आहे. गंमत अशी आहे माझ्या घरात 12 डिसेंबरचे तीन-चार वाढदिवस आहेत. जयंत, विभावरी, माझा एक पुतण्या, माझ्या बहिणीची मुलगी तिचा वाढदिवसही 12 डिसेंबर आहे. त्यात आई 12 डिसेंबरची. मी 12 डिसेंबरचा आणि पणतू 13 डिसेंबरचा. काही योग असतो, पण हे आहे ते खरं आहे, असेही ते म्हणाले.
कवितेमुळे अस्वस्थ
विविध लोकांमुळेच मी समृद्ध झालोय आणि अजूनही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी खूप काम करायचंय, लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी अजूनही मन सतत अस्वस्थ असतं. पवारांनी आपल्या भाषणातून मोतीराज बंजारा या कवीची कविता सादर करुन त्या कवितेतील ओळ्यांमुळे मी अजूनही अस्वस्थ असल्याचे आवर्जू नमूद केले.
मी महाराष्ट्रात फिरत असतो. लोकांना भेटल्यावर मला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं. त्यांचं गार्हाणं ऐकायला मिळतं. अनेक ठिकाणी मी जातो. अनेकदा मी छोट्या समाजातून आलेल्या लोकांसोबत दिवस घालवले आहे. अनेकांना ऐकायला बरं वाटतं. अलिकडच्या काळात लिहिणारे विचार करणारे अनेक लोक तयार झालेले मिळतात.
शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष