पोलादपूरमार्गे पश्चिम महाराष्ट्राशी थेट संपर्क; प्रवासाचा वेळ कमी, उद्योग-पर्यटनाला मोठी चालना
| माणगाव | प्रतिनिधी ।
कोकणच्या विकासाचा चेहरा- मोहरा बदलणारा आणि रायगडसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणारा दिघी बंदर पोलादपूर सुरूर ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढे आणला आहे. सुमारे 140 किलोमीटर लांबीच्या या नव्या महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळणाला ऐतिहासिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा महामार्ग दिघी बंदर, पोलादपूर आणि सुरूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) यांना जोडणार आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांपर्यंत मालवाहतुकीसाठी जलद आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. विशेषतः दिघी बंदराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, औद्योगिक गुंतवणूक, निर्यात, पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबई-गोवा महामार्ग आणि महाबळेश्वर घाटमार्गावरील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघात लक्षात घेता हा नवा महामार्ग पर्यायी मार्ग म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे कोकणातून पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, इंधन आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर परिसराच्या विकासालाही नवे दालन खुले होणार आहे. पर्यटनस्थळे, कृषीमाल, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उद्योगांना देशांतर्गत बाजारपेठेशी अधिक वेगवान संपर्क मिळेल. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. सध्या हा प्रकल्प प्रस्ताव आणि डीपीआर तयार करण्याच्या टप्प्यात असून, त्यानंतर अंतिम मंजुरी, भूसंपादन आणि बांधकामाची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोकणातील नागरिक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राकडून या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.
