योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी डाक विभागाचा उपक्रम
अधीक्षक डॉ. संजय लिये यांचा पुढाकार
| सारळ | वार्ताहर |
सुकन्या योजनेमुळे मुलींच्या जीवनात समृद्धी येईल, असा विश्वास रायगड डाक विभागाचे अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय बालिका दिवसाचे निमित्त साधत स्त्रीशक्तीचे सबलीकरण करण्याकरिता मुलींचे भवितव्य घडवणारी सुकन्या समृद्धी योजना समाजाच्या तळागाळात पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम डाक विभागाने हाती घेतला असून, एका दिवसात सुकन्या समृद्धीची 557 खाती उघडण्याची किमया केल्याचे डॉ. लिये यांनी सांगितले.
स्त्रीशक्तीचे सबलीकरण करण्याकरिता त्यांना प्रथम आर्थिक सक्षम करणे गरजेचे वाटून त्यातूनच सुकन्या समृद्धीसारख्या योजनेचे निर्माण झाले. ज्यात मुलीचा जन्म झाल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबात जो ताण येतो, तो नाहीसा व्हावा हा एक दृष्टीकोन असल्याचे डॉ. लिये यांनी सांगितले. या योजनेची खरी गरज आदिवासी समाज, भटक्या विमुक्त जाती जमाती, आर्थिक दुर्बल यांना आहे. पण, यापैकी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांनीच या योजनेत सहभाग घेतला आहे.
मुळात, 0 ते 10 वयातील मुलीच्या नावे रु 250/- भरून हे खाते काढता येते. सलग पंधरा वर्षे त्यात पैसे भरावे लागतात. वर्षाला 250 रु भरले तरीही हे खाते चालू राहते. अगदी 50 रुपयेही ह्या खात्यात भरता येतात 21 वर्षे झाल्यानंतर त्याची परिपूर्ती होते. चक्रवाढ व्याज असल्याने भरलेल्या रकमेच्या तीनपट रक्कम त्या मुलीला मिळते. मुलीचे शिक्षण व लग्न हे दोन हेतू यातून पूर्ण करण्यास मदत होते. मुलीच्या लग्नासाठी हे खाते मुदतीपूर्वी बंद करण्याची सोय आहे.
रायगड विभागाचा पदभार स्वीकारल्यावर रायगड विभागातील कर्मचारी वर्गाला सामाजिक जाणिवेचे धडे देत, तसेच डाक विभागाच्या योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्याचा वापर करत त्यांनी सर्व कर्मचारीवर्गाशी सुसंवाद साधल्यामुळे रायगड डाक विभागाने प्रभात फेरी काढून जनजागृतीची मोहीम चालू केली आहे.
राष्ट्रीय बालिका दिवस व प्रजासत्ताकदिनी झालेल्या लहानशा कार्यक्रमात रायगड डाक विभागातर्फे संजना संजय म्हात्रे यांचा गौरव एका दिवसांत सर्वात जास्त सुकन्या समृद्धी खाती काढल्याबद्दल केला गेला. तसेच रायगड डाक विभागाचे नाव देश पातळीवर नेऊन रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल पूर्णिमा सातपुते यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाक विभागाच्या सर्व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.