गाव ते शहर माहितीविषयी जनजागृती

जिल्हाभर ‌‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविणार

| रायगड | खास प्रतिनिधी |

आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत गावागावात ‌‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये पाच उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. याबाबत करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या तयारीसाठी डॉ. बास्टेवाड यांनी बैठक घेत तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी हा अभियानाचा उद्देश आहे. या अभियानात जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व 809 ग्रामपंचायती, 15 पंचायत समित्यांनी योगदान देणे अभिप्रेत आहे. अभियानांतर्गत 9 ते 14 ऑगस्ट यादरम्यान कोणत्याही एका दिवशी पाच उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ यांसह विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.

अभियानांतर्गत राबविण्यात येणारे पाच उपक्रम
शिलाफलक लावणे:
गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर शाळा/ ग्रामपंचायत) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शिलाफलकावर लिहिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले, अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात येईल.
वसुधा वंदन: यामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात येईल.
स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन: ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान करण्यात येईल.
पंच प्रण (शपथ) घेणे: देशाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी शपथ देण्यात येईल.
प्रत्येक घरावर झेंडावंदन: प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

गावातील माती जाणार दिल्लीला
अभियानांतर्गत तालुकास्तरावर प्रत्येक गावातील माती एका कलशात जमा करण्यात येणार आहे. या कलशावर तालुका व जिल्ह्याचे नाव पेंट करून किंवा रेडियमने लिहावे. हा कलश 27 ते 30 ऑगस्टदरम्यान प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमात पाठवण्यात येणार आहे.

Exit mobile version