गुजरात राज्यात पाठविला जात असल्याची माहिती
| रसायनी | राकेश खराडे |
विशाखापट्टनम व्हाया पुणे अन् कर्जतकडे निघालेला तब्बल सव्वापाचशे किलो गांजा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे-नगर रस्त्यावर पकडला. प्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यातून वाहतूक होणारा गांजा पकडण्यात आला असून, हा गांजा कर्जतमधून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यासह गुजरात राज्यात पाठविला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
संदीप बालाजी सोनटक्के (29, रा. रायगड), निर्मला कोटेश्वरीमुर्ती जून्नरी (36, रा. गट्टुर, आंध्रप्रदेश), महेश तुळशीराम परीट (29, रा.तुपगाव चौक-खालापूर रायगड) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमदंडी, संदीप जाधव यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा होत असल्याचे वास्तव पुणे पोलिसांनी कारवाईतून समोर आणले आहे. यासोबतच पुण्यातून या ड्रग्सची देखील वाहतूक होत असल्याचे दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवरच पुणे पोलिसांकडून तस्करांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यादरम्यान, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. त्यानूसार पथक गस्तीवर असताना आंध्रप्रदेशातून नगर रस्त्यावर कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार पथकाने सापळा रचून नगर रस्त्यावर स्कॉर्पिओ व सेलेरिओ या दोन संशयीत गाड्या थांबविल्या. वाहनांची तपासणी केली असता त्यात गांजा भरलेल्या बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कारमध्ये 1 कोटी 4 लाखांचा तब्बल 520 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, स्कॉर्पिओ, सेलेरिओ गाडी आणि मोबाईल असा तब्बल 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी आंध्रप्रदेशातून गांजा विकण्यासाठी आणला होता. पुण्यात तसेच वाहतूकीदरम्यान पोलिसांनी गाडी अडवू नये, यासाठी आरोपींनी स्कॉर्पिओ व सेलेरिओ या गाड्यांसोबतच या महिलेला कारमध्ये बसविलेले होते. यापुर्वीही तीन वेळा त्यांनी अशाप्रकारे गांजा आणला असल्याचे तपासात समोर आले आहे.