वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ
| खोपोली | प्रतिनिधी |
हार-जीत ही खेळातील अपरिहार्यता जरी असली तरी त्याकडे न पाहता खेळातून निखळ आनंद मिळवावा, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तथा क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2023-24 चे उद्घाटन शनिवारी त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस समारंभाध्यक्ष संतोष जंगम, अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी उद्घाटक क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि प्रमुख पाहुणे आस्वाद पाटील यांचे स्वागत केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरकुल क्रीडा महोत्सव 2023-24 चे आयोजन दि.2 रोजी जनता विद्यालयाच्या कै.मो.श्री. पंत पाटणकर क्रीडांगणावर करण्यात आले आहे. अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात हजारो विद्यार्थी, खेळाडू, पालक आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या साक्षीने उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध कला आणि क्रीडा कौशल्यांचे प्रात्यक्षिक तथा सादरीकरण करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे अनावरण, ध्वजारोहण, खेळाडूंचे संचलन मोठ्या दिमाखात पार पडले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये गुणांकन प्राप्त संस्थेतील खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात रवी शास्त्री यांनी हा सोहळा पाहिल्यावर मला माझे शालेय जीवनातील दिवस आठवल्याचे सांगत क्रीडा स्पर्धेत सहभाग हा महत्त्वाचा असतो, हार-जीत ही खेळातील अपरिहार्यता जरी असली तरी त्याकडे न पाहता खेळातून निखळ आनंद मिळवावा, असे प्रतिपादन केले. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या क्रीडा रसिकांना शुभेच्छा देताना चक्क मराठीत खेळाचा सन्मान करा, आनंद लुटा आणि हजारो खेळाडूंना जिंका, असे आवाहन त्यांनी केल्यावर टाळ्यांच्या गजरात वाहवा मिळवली. संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. यानिमित्ताने संस्थेचे आजी-माजी संचालक आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या विविध विभागांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महोत्सवाच्या संपन्नतेत सहभाग नोंदवला.
क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. कारण, खेळातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, खेळातून शिस्त अंगी भिणते, यश पचविण्याच्या वृत्तीसोबत पराभव स्वीकारण्याची मानसिकता विकसित होते.
रवी शास्त्री