। अहमदनगर । प्रतिनिधी ।
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा आहे. आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, या बातमीमुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास ते सक्रीय राजकारणापासून दूर जाऊन त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. सत्ता नाट्यात विखे-पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर आता विखे-पाटील यांच्या बाबतीतही असा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागल्याने वखे-पाटील कार्यकर्त्यांमधूनही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.