। उरण । वार्ताहर ।
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम असल्याने उरण तालुक्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून खोपटा गावाजवळील भात शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गुरुवारी रात्रीपासून उरण तालुक्यात पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली. सदर पाऊस हा भात रोपांना, शेतीला पोषक ठरत असल्याने भात शेतीला वेग येणार आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.तसेच रानसई धरण व पुनाडे धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने व हिच परिस्थिती कायम राहील्याने धरण परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
खोपटा सह इतर गावात पावसाच्या पाण्याचा निचरा होणारे स्त्रोत हे विकासक करीत असलेल्या दगड मातीच्या भरावा मुळे बंद पडल्याने पावसाचे पाणी साचून राहिल्याचे चित्र ठिक ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यातच खोपटा गाव परिसरातील भात शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र ही पाहावयास मिळत आहे.एकंदरीत पावसाची गती अशीच राहिली तर पुढील एक दोन दिवसात शेतीच्या मशागतीची, लागवडीची कामे जोरात सुरू होतील असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.