कोरोनावर राहुल गांधींची श्‍वेतपत्रिका

सरकारवर टिकेसाठी नाही मदतीसाठी हात पुढे
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना संकट हाताळण्यावरुन मोदी सरकारवर टीका कऱणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी कोरोना संकटाचा सामना कऱण्यासाठी पक्षातर्फे श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका करण्याचा हेतू नसून संभावित तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी देशाला मदत करण्यासाठी ही श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केल्याचं सांगितलं आहे.

संपूर्ण देशाला तिसरी लाट येणार असल्याचं माहित आहे. सरकारने त्यासाठी तयार राहावं असा आमचा आग्रह आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे. श्‍वेतपत्रिकेचा हेतू सरकारडे बोट दाखवत टीका करण्याचा नसून देशाला संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यात मदत करण्याचा आहे, असं राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं. दुसर्‍या लाटेचा सामना करताना नेमक्या काय चुका झाल्या याची संपूर्ण माहिती यामध्ये असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत कोरोनाशी लढताना करणण्यात आलेलं व्यवस्थापन वाईट होतं. यामाग अनेक कारणं होती. आम्ही ती कारण या श्‍वेतपत्रिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लाट आल्यास नेमकं काय करावं सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.पुढे ते म्हणाले की, करोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 90 टक्के लोकांचा जीव वाचवता आला असता. यामागचं सर्वात मोठं कारण ऑक्सिजनचा तुटवडा होतं. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही पण ऑक्सिजन वाचवू शकतो.
तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्‍वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि 100 टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. सरकार पूर्णपणे तयार असलं पाहिजे. रुग्णालयं, ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असलं पाहिजे, असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.तर दुसरा खांब श्‍वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणं आहे. तिसर्‍या लाटेसाठी सरकारने तयार असणं गरजेचं आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी याचा अर्थ दुसर्‍या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणं, असल्याचं म्हटलं आहे.

Exit mobile version