। महाड । प्रतिनिधी ।
राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यटन स्थळे गजबजू लागलेली असताना पुन्हा पर्यटनस्थळे शांत झाली. किल्ले रायगड हे एक महाराष्ट्रातील महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ असल्याने दर दिवशी हजारो पर्यटक या परिसरामध्ये दिसत होते; परंतु अचानक पर्यटनावर बंद घालण्यात आल्याने सर्व व्यवहार बंद करावे लागले आहेत, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये असलेल्या अनेक गावांचा उदर निर्वाह हा पर्यटकांवर अवलंबून असल्याने दर दिवशी येणार्या हजारो पर्यटकांमुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता. रायगडवाडी, हिरकणीवाडी, परडीवाडी, टकमकवाडी येथील छोटे व्यवसाय करणार्यांना चांगलाच फटका बसला आहे. या ठिकाणी व्यवसाय करणारे सरबत, ताक, दही यांची विक्री, त्याचबरोबर हॉटेल, लॉजिंग व्यवसाय केले जातात. परंतु, 2019 मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर स्थानिक व्यवसायावर संक्रांत आली. आत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
रायगडच्या परिसरांमध्ये कोरोनाचा संसर्ग जरी जाणवत नसला तरी शासनाने पर्यटन स्थळे बंद केली आहेत. यामुळे रायगडावर गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटक येणे बंद झाले आहे. या शिवाय खाजगी प्रवासी वाहातुकीवर देखिल विपरीत परिणाम झाला आहे, असे असले तरी कांही शिवप्रेमी पर्यटक गडाच्या पायथ्याशी येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु सुरक्षा रक्षकांमध्ये त्यांना गडावर जाण्यास मनाई करण्ंयात येत आहे. त्यामुळे निराश होऊन राज्यांतून आलेल्या शिवभक्तांना दर्शन घेता परत जावे लागत आहे. पाचाड, हिरकणीवाडी, रायगडवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांची रोजीरोटी पर्यटकांवर अवलंबून असल्याने शासनाने अशा छोट्या व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी जनसंवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केली आहे.