। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त देशभरात केंद्र शासनाच्या वतीने अंत्योदय मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमेत केंद्र शासनाकडून रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 28 एप्रिल ते 26 जून कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे. अंत्योदय मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला बचत गट स्थानिक स्वंयसेवी संस्था, स्वंयसेवक, स्वातंत्र्य सैनिक, युवा गट, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी गट, मच्छीमार संस्था व सोसायटी यांचे सहकार्य घ्यावे तसेच तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, तालुका समन्वयक यांच्या समन्वयाने राबविणेत यावी. या संदर्भात जिल्हातील युवा संस्था, शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने कला पथक, प्रभात फेरी, ग्रामसभा, विविध जंयती दिनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुंटूंबीयांचा सत्कार इत्यादी उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणार्या उपक्रमांचे फोटो तसेच माहितीचे संकलन तालुका स्तरावर करण्यात यावे. सदर मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात यावा. तसेच सदर मोहीम कालावधीत प्रत्येक महीन्यात किमान 1 विशेष ग्रामसभेचे आयोजन करून त्यामध्ये या मोहीमेची व मोहीमे अंतर्गत घेतलेल्या कामांची सविस्तर माहिती देऊन जनजागृती करावी. त्याचबरोबर मोहीम कालावधीत ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक पंधरवाडयास विशेष शिबिराचे आयोजन करून विविध योजनांची कृती संगमाद्वारे अमंलबजावणी करावी. यासंदर्भात आयोजीत केलेल्या कामाचे फोटो, वृत्तपत्रातील बातमी, चित्रफित इत्यादी माहिती जिल्हा समन्वय तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांना पाठविण्यात यावी.