इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
। उरण । वार्ताहर ।
रायगडची जलकन्या म्हणून ओळखल्या जाणार्या रुद्राक्षी टेमकर या अवघ्या 11 वर्षीय मुलीने सोमवारी धरमतर ते मांडवा हे 26 कि.मी. अंतर 5 तास 54 मिनिटांत पूर्ण करून विक्रमाला गवसणी घातली आहे. जिल्हाभरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे. रुद्राक्षी टेमकरच्या हिच्या धाडसी प्रयत्नाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
रुद्राक्षी मनोहर टेमकर या 11 वर्षीय मुलीने शिवजयंतीच्या दिवशी नवा विक्रम करत छत्रपती शिवाजी महाराजांना आगळेवेगळे असे अभिवादन केले आहे. रुद्राक्षी ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने रेवस ते गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया पोहून पार केले होते. त्यानंतर तिच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील पहिली मुलगी
रुद्राक्षीने सोमवारी मध्यरात्री दीड वाजता समुद्राच्या लाटांवर झेप घेत, धरमतर ते मांडावा हे सागरी 26 कि.मी. अंतर पोहून पार करत एक नवा विक्रम स्थापित केला आहे. धरमतर ते मांडावा जेट्टी पोहून पार करणारी रुद्राक्षी पहिली मुलगी ठरली आहे. रुद्राक्षीने हे अंतर 5 तास 54 मिनिटांत पूर्ण केले. तिच्या या यशस्वी कामगिरीची सर्व स्तरातून दखल घेण्यात येत असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.