| रत्नागिरी | वार्ताहर |
कोकण रेल्वेची सेवा गेल्या 24 तासांपासून ठप्प आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा बंद आहे. रेल्वे रुळावरुन दरड बाजूला काढण्यात यश आले आहे. मलबा सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु आहे. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सोड्यात आले आहे. स्टेशनवरून 25 चिपळूणमधून 15 तर खेडमधून 10 बस सोडल्या आहेत. एसटीच्या बसेस अडकलेल्या प्रवाशांना घेऊन थेट मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.
कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे देखील समोर आले आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानतंर पुण्याहून एनडीआरएफच्या तीन तुकड्या रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची एक तुकडी चिपळूणमध्ये, एक रायगडमध्ये आणि खेडमध्ये एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. गरज पडली तर पुण्याहून अजून तुकड्या मागणव्यात येतील, अशी माहिती पुणे एनडीआरएफ प्रमुखांनी माहिती दिली आहे. एनडीआरएफ टीमकडून रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये बचावकार्य सुरू आहे. चिपळूनमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूनला देखील आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे दरड काढण्याच्या कामाला विलंब होत होता. आता मात्र काही तासात रेल्वे सेवा सुरळीत होईल अशी शक्यता आहे.