। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्हयाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, घनदाट जंगले ,ट्रेकर्सना खुणावणारे डोंगरकडे यामुळे विशेष करून पावसाळ्यात वर्षा सहलीच्या पर्यटनाचा आनंद घेणार्या पर्यटकांचा या जिल्ह्याकडे आणि विशेष करून कर्जतकडे मोठा ओढा, आकर्षण आहे. मात्र प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करत या सर्व स्थळांवरच जाण्यास प्रतिबंध घातले आहेत. यामुळे पर्यटकांचा तर हिरमोड झालाच याशिवाय या पर्यटन स्थळांजवळ जे या संधीचा फायदा घेऊन व्यवसाय करत चारपैसे मिळवून कुटुंबाला हातभार लावायचे त्यांच्या धंद्यावर तर या बंदीच्या निर्णयामुळे कुर्हाडच कोसळली आहे.
पर्यटन खुले केले तर त्या भागातील स्थानिक चहावाले, वडापाववाले, नाश्ता, जेवण बनवून देणारे, रिसॉर्ट यांचा चांगला व्यवसाय होऊ शकतो. शासनाच्या मदतीने मोठया प्रमाणात लाईफ जॅकेट पुरवणारी योजना उभी केली जाऊ शकते, ते घेऊनच पाण्यामध्ये जाण्यास परवानगी द्यावी, त्यामुळे पर्यटकांनाही धोका नाही आणि बंदी आणण्याची गरज नाही. त्यामुळे वर्षा पर्यटन धोक्याविना सुरु ठेवता येईल.त्यामुळेही रोजगार निर्माण होईल. त्याचबरोबर आपत्कालीन संस्थाचे कार्यकर्ते शासनाच्या मदतीने तिथे सुरक्षा पुरवतील, या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारून प्रवेश फी आकारून स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी उभा करता येईल, जेणेकरून व्यवस्था उभी करायला मदत होईल.
पावसाळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी व ट्रेकिंगला कर्जतला पसंती देतात,आषाणे बेकरे,वदप,नेरळ,जुम्मापट्टी,सोलनपाडा,कोंढाणा लेणी,माथेरान, पेब व पेठ किल्ला पांडवलेणी, असे अनेक धबधबे,लेणी,पर्यटन स्थळे व ऐतिहासीक स्थळे आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल व स्थानिक लोकांना, रोजगार निर्माण होईल. तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेल.
— सागर शेळके