| मुंबई | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच महाराष्ट्रात 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधारेची शक्यता वर्तविली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने हवेतही कमालाची उष्मा निर्माण झाला आहे.त्यातच गणेशोत्सवाची धामधूम राज्यभरात सुरु आहे.सोमवारी घरगुती गौरी,गणपतींचे विसर्जन करण्यात आले.त्यावेळी पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला.मात्र,अद्यापही अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरु राहणार असल्याने या काळात पावसाने जोरात हजेरी लावली तर उत्साहावर पाणी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तरीही वाढलेला उष्मा पाहता पाऊस पडावा,अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.