नवरात्रोत्सवात पावसाचा ‌‘गरबा’

जाता जाता तडाखा देणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

| रायगड | प्रतिनिधी |

परतीची वाट धरलेला मान्सून आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळे यंदा नवरात्रोत्सवात पावसाचाच गरबा बघायला मिळण्याचा अंदाज आहे. पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून, मुंबईसह राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. माघारी निघालेला मान्सून जाता जाता महाराष्ट्राला झोडपण्याचा अंदाज आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून बाहेर पडेल, पण तोपर्यंत चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. 23 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील काही दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार, तर इतर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने 27 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातही काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 26-27 सप्टेंबरला या भागात अतिमुसळधार कोसळणार 
25 सप्टेंबरनंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस वाढणार आहे. 26 सप्टेंबर रोजी विदर्भातील नागपूर , वर्धा, यवतमाळ, चंद्र पूर गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Exit mobile version