। मुंबई । प्रतिनिधी ।
मोदी सरकारची दिशाहीन आर्थिक नीती आणि महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत रविवारी (दि.4) रामलीला मैदानावर महारॅली काढण्यात येणार असून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा या रॅलीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले असून, त्यांच्या भाजपप्रवेशाबाबत हेतुत: संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप चव्हाण समर्थकांनी केला आहे.
अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. चव्हाण हे बारा आमदारांना घेऊन काँग्रेस सोडणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून पसरले आहे. चव्हाण, फडणवीस यांनी या बैठकीचा इन्कार केला असला तरी गणपती दर्शनाच्या निमित्ताने कदाचित कळत, नकळत भेट झाल्याचे उभयतांनी मान्यही केलेले आहे. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे.