राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कानमंत्र
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा रत्नागिरी दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फलदायी ठरला आहे. पक्षाच्या मुळावर येणारे रत्नागिरीतील गटतट मोडीत काढण्याच्या त्यांच्या कानमंत्राचा चांगलाच परिणाम दिसून आला आहे. ऐन दिवाळीमध्ये रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गटातटांना तिलांजली देत पक्षवाढीसाठी एकदिलाने काम करण्याचा निर्णय झाला. आगामी पालिका निवडणुकीत जोमाने काम करून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसण्याचा निर्धार सर्वांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप बोरकर (रा. सोमेश्वर) यांची नियुक्ती पक्षाने केली. निवडीचे पत्र देण्यानिमित्त हे सर्व पदाधिकारी एकत्र आले होते. या वेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, प्रदेश प्रतिनिधी बशिर मुर्तुझा, बाप्पा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, माजी तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुदेश मयेकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, बाप्पा सावंत आदी उपस्थित होते. रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात उतरती कळा लागली. उदय सामंत यांच्यासह 90 टक्के पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत गेले. तेव्हापासून पक्षाची पुरती घडी विस्कटली आहे. त्यात काही निष्ठावंतांनी एकत्र येऊन पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला अपेक्षित यश आले नाही.
अंतर्गत कलहामुळे काहींनी पक्षाविरुद्ध काम केले म्हणून तत्कालीन तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामध्येही हस्तक्षेप झाला. या दरम्यानच्या काळात 2019 मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. यावेळी सुदेश मयेकर यांनी थेट सेनेचे तगडे उमेदवार उदय सामंत यांना आव्हान दिले. यावेळी सेनेचे वरिष्ठ प्रचारासाठी जिल्ह्यात राबत होते; परंतु सुदेश मयेकर यांच्या प्रचारासाठी एकही वरिष्ठ नेता आला नाही. त्यामुळे मयेकर नाराज होऊन तटस्थ होते. त्यानंतर कुमार शेट्ये विरुद्ध बशिर मुर्तुझा असे पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण चव्हाट्यावर आले.
दोन्ही गट एकमेकांविरुद्ध सक्रिय झाल्यामुळे उरल्यासुरल्या पक्षाची बदनामी सुरू झाली. या सर्व घडामोडीमध्ये कार्यकर्ते संभ्रमात पडले. पक्षाची मोठी हानी झाली. वरिष्ठांनी एकदा समज देऊनही त्यामध्ये सुधारणा झाली नाही. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर पक्षाच्या बैठकीमध्ये उघड तक्रारी झाल्या. याची गंभीर दखल घेऊन पाटील यांनी दोन्ही गटांची कानउघडणी केल्याने पक्षाला चांगलाच फायदा झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नवचैतन्याचे वातावरण आहे.
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांना सूचना केल्यानंतर गटतट बाजूला ठेवून पक्षबांधणी आणि वाढीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आगामी पालिका निवडणुकीत जोमाने काम करून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसविण्याचा निर्धार केला. – नीलेश भोसले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, रत्नागिरी