रत्नागिरी पालिकेकडून थकीत घरपट्टीच्या 47 प्रॉपर्टी सील

| रत्नागिरी | प्रतिनिधी |
आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिकेच्या वसुली पथकाने थकबाकीधारकांना दणका दिला. घरपट्टी थकविणार्‍या 47 मालमत्ता पालिकेने सील केल्या. त्यात मोबाईल टॉवर, मंगल कार्यालय, इमले आणि नॉन बँकिंग कंपन्यांच्या काही कार्यालयांचा समावेश आहे. पालिकेपुढे अजूनही साडेसहा कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पालिकेची कारवाई टाळण्यासाठी इमलेधारकांनी घरपट्टी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेची दरवर्षी सुमारे 28 हजार इमलेधारकांकडून सुमारे सात कोटींची घरपट्टी वसुली होते. मात्र, कोरोना काळामुळे घरपट्टी थकबाकी 14 कोटींवर गेली. यापूर्वी पालिकेने अनेक सवलती दिल्या होत्या. आता मार्च महिना निम्मा संपला असून, आर्थिक वर्षअखेर जवळ आले आहे. त्यामुळे पालिकेने थकबाकी धारकांविरोधात कठोर पावले उचलली. 55 टक्के थकबाकी वसूल झाली असून, उर्वरित साडेसहा कोटी रुपयांचे मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. थकबाकीदार असलेल्या शासकीय कार्यालयांना यापूर्वीच रेडकार्ड देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून सुमारे 66 लाख 50 हजार रुपये येणे बाकी आहे. नोटिसा देऊनही घरपट्टी न भरल्याने पालिकेच्या वसुली पथकाने थकबाकीधारकांना झटका दिला.
पालिकेने नाचणे रोड येथील मंगळवार आठवडा बाजार येथील ए.टी.सी. इंडिया या कंपनीचा मोबाईल टॉवर ङ्गसीलफ करण्यात आला. तसेच, एका मंगल कार्यालयाचा समावेश आहे. संचयनी, निसर्ग फॉरेस्ट, काही ब्लॉक, सदनिका अशा 47 प्रॉपर्टी पालिकेच्या मालमत्ता विभागाने ङ्गसीलफ केल्या. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाचे अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, अभियंता शिवचर आदींचा समावेश आहे.

Exit mobile version