विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
| अलिबाग | वार्ताहर |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) द्वारे अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आलेली नोकर भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. आरसीएफने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी ॲड. प्रवीण ठाकूर यांनी आरसीएफचे सीमडी यांना तात्काळ ईमेल करून रद्द भरती प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
ॲड. ठाकूर यांनी आपल्या पत्रात त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरसीएफने काही महिन्यांपूर्वी विविध पदांसाठी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता विशेष भरती मोहीम जाहीर केली होती. हजारो विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी अर्ज केले होते. अनेकांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च केला होता. काही उमेदवारांनी तर खासगी नोकऱ्या सोडून या भरती प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले होते.
मात्र, दोनच दिवसांपूर्वी 19 जून रोजी आरसीएफने स्थानिक वर्तमानपत्रात व त्यांच्या वेबसाईटवर एक अधिकृत सूचना जारी करत ही भरती प्रक्रिया ‘अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव’ रद्द करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामागे नेमकी कोणती प्रशासकीय कारणे आहेत, याबाबत आरसीएफने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि तीव्र नाराजी पसरली आहे.
या अनपेक्षित रद्दबातलमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आम्ही खूप अपेक्षा ठेवून या भरतीची तयारी करत होतो. आता अचानक हे रद्द झाल्याने आमचे सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. भविष्यात पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, याची खात्री नाही.’
सामाजिक संघटनांनी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी व अखील भारतीय काँग्रेस पक्षाने आरसीएफच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी आरसीएफला लवकरात लवकर या भरती प्रक्रियेबाबत पुनर्विचार करण्याची किंवा रद्द करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
या प्रकारामुळे सरकारी आणि निमसरकारी संस्थांमधील भरती प्रक्रियांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो आशाळभूत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी ठेवणाऱ्या या निर्णयावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आरसीएफने लवकरात लवकर या भरती प्रक्रियेबाबत पुनर्विचार करावा व या भरतीसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. प्रवीण ठाकूर यांनी केली आहे.