7000 कोटींचा व्यवसाय टप्पा यशस्वीरित्या पार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकारी बँकिंगची निर्माण केलेली राज्यातील ओळख अधिक दृढ करीत आपला व्यवसाय टप्पा 7000 कोटींच्या पुढे नेला आहे. असा व्यवसाय टप्पा पार करणाऱ्या राज्यातील महत्त्वाच्या बँकांमध्ये रायगड जिल्हा बँकेने आपले नाव नोंदविले आहे. विशेष म्हणजे, मार्च 2025 च्या तुलनेत बँकेचा व्यवसाय तब्बल 1300 कोटींनी वाढलेला असून, यामध्ये बँकेच्या ठेवीमध्ये झालेली लक्षणीय वाढ हे प्रमुख कारण ठरले आहे.
बँकेने आपल्या सहामाही कामगिरीमध्ये क्यू आर कोड, आयएमपीएस, यूपीआय -आधारित सेवांवर भर दिल्यामुळे बँकेच्या सेव्हिंग आणि करंट ठेवीत सातत्याने वाढ होत आहे. शिवाय, सहकारी बँकिंगमधील सर्वाधिक विश्वासार्ह संस्था म्हणून जिल्ह्याबाहेरील विश्वस्त संस्था, व्यापारी संघटना आणि सहकारी सोसायट्यांनीही बँकेच्या मुदतठेवीमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेने डिजिटल सेवा विस्तार आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्याकडे विशेष आणि तांत्रिक उन्नतीमुळे व्यवहारांची गती, सुरक्षितता आणि ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारला आहे याबाबत माहिती दिली, तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांनीही डिजिटल पद्धतींचा स्वीकार वाढवल्याने बँकेच्या ठेवीत व व्यवहारात नैसर्गिक वाढ होत आहे, असे प्रतिपादन केले.
बँकेने एनपीए नियंत्रण आणि कर्ज प्रक्रियेतील पारदर्शकता यावरही प्राधान्याने काम केले असून, यामुळे बँकेवरील सार्वजनिक विश्वास अधिक दृढ झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळाचा दैनंदिन कारभारातील सहभाग, निर्णयक्षम नेतृत्व आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळे बँकेची एक नवी, सक्षम आणि आधुनिक प्रतिमा निर्माण होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार वर्तक यांनी या यशाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले,ङ्गङ्घबँकेची वाढ ही फक्त आकड्यांपुरती मर्यादित नसून, ग्रामीण ग्राहकांच्या गरजांना प्रतिसाद देणाऱ्या आमच्या सेवा-तत्त्वज्ञानाची ही जमेची बाजू आहे. पुढील काळात तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि वित्तीय शिस्त या तीनही आघाड्यांवर बँक आणखी मजबुतीने काम करणार आहे.
ग्राहक आणि सभासदांचे मनापासून आभार. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेली ही प्रगती म्हणजे संपूर्ण रायगडच्या विश्वासाची कमाई आहे.
– जयंत पाटील, चेअरमन
