फडणवीसांच्या आदेशानेच बंड- तानाजी सावंत

| मुंबई | प्रतिनिधी|

2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केली, असा गौप्यस्फोट शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून 150 बैठका घेतल्या नि आमदारांचं मन वळवलं, असा दावाही तानाजी सावंत यांनी केला.

जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणार्‍या लोकांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो, असंही तानाजी सावंत म्हणाले. धाराशिव जिल्हा दौर्‍यावर आले असताना एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. सावंतांनी हा दावा केला.

नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो, जनतेने कलही आमच्या बाजूने दिला, मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या असल्याचं डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचं सांगणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?
30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 3 जानेवारी 2020 च्या आसपास सुजितसिंह ठाकूर, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता, असं ते म्हणाले.

मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करुन सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही, असं तानाजी सावंत म्हणाले.

Exit mobile version